मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे २००० रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. या हप्त्यासाठी एकूण १८,००० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे यापूर्वी पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २१व्या हप्त्याची रक्कम आधीच पाठवण्यात आली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळेल, जे त्यांच्या शेतीसाठी आणि जीवनव्यवस्थेसाठी उपयोगी ठरेल. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना मात्र पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळल्याची माहिती समोर आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका यादीतील माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे. येत्या तपासणीतून काही शेतकरी योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरल्याने अडीच लाख शेतकऱ्यांची नावे २१व्या हप्त्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, त्यांच्या नावाचा समावेश पीएम किसान योजनेच्या यादीत आहे की नाही. योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव कसे तपासायचे हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ऑनलाइन सुविधा वापरून सहज पाहता येईल. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे २००० रुपये महाराष्ट्रातील ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १९ नोव्हेंबर रोजी जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते. याआधी, 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांना या योजनेतील २०व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आली. या योजनेचा पहिला हप्ता २४ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. तेव्हापासून आतापर्यंत २० हप्ते वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या योजनेसह राज्य सरकारही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत २००० रुपये देते. राज्य सरकारच्या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







