मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईतील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या २२६ इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगर ६५ तर पश्चिम उपनगरातील १२६ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. इमारत ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित केल्यानंतरही काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. नागरिकांनी तत्काळ घराचा ताबा सोडून इमारत स्वतःहून पाडावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत संबंधित सक्षम प्राधिकरणानी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्यांची राहील आणि त्यासाठी पालिका जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या कालावधीत इमारतीमध्ये पावसाचे पाणी मुरल्यामुळे इमारती/इमारतीचे भाग कोसळण्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे धोकादायक इमारतीबाबत नागरिकांना सावधगिरी बाळगण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जागरूक राहणे, आवश्यक आहे. आपापल्या परिसरातील इमारतीवर लक्ष ठेवून भविष्यातील दुर्घटना टाळता येतील, असे आवाहन पालिकेने केले आहे.





