पुणे : पुण्यातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी जालीम उपाय शोधला असून, वारंवार वाहतूक नियमनांचा दंड तसेच कारवाई करून देखील बेशिस्त वाहन चालकांना चाप बसत नसल्याने थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या पाच दिवसात शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये २३ गुन्हे दाखल केले असून, यामध्ये आर्थिक दंडासह सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेशिस्ताला लगाम लावण्याचा हा जालीम उपाय किती यशस्वी ठरतो हे पहावे लागणार आहे. शहरातील वाहतुकीला सर्वसामान्य पुणेकर तसेच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मध्यभाग ते उपनगरापर्यंत आणि मुख्य रस्ते अशा सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी होते. सकाळी व सायंकाळी रस्त्यांवर वाहने चालविणे देखील कठीण होते. हे चित्र बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असले तरी वाहनांची संख्या तसेच कित्येक वर्षांपासून रस्त्यांची रूंदी यामुळे म्हणावे तसे यश येत नाही.
वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी हे केले जात असताना बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.





