नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण अंडी खात असतील. मात्र, ही अंडी कधीची असतात हे सांगणे कठीण होते. कारण, ही अंडी अनेक दिवसांची देखील असू शकतात. त्यामुळेच आता उत्तर प्रदेश सरकारने अंड्यांच्या व्यापारावर कडक नियंत्रण आणले आहे, यामुळे ताजी अंडी असल्याचा दावा करून जुनी अंडी विकणाऱ्यांना ते अशक्य झाले आहे. १ एप्रिलपासून, उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक अंड्यावर मुदत समाप्तीची तारीख छापणे अनिवार्य केले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने ग्राहकांच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून, आता प्रत्येक अंड्यावर ‘मॅन्युफॅक्चरिंग’ आणि ‘एक्सपायरी डेट’ छापणे अनिवार्य केले आहे. यामुळे ग्राहकांना अंडे किती जुने आहे आणि ते खाण्यासाठी सुरक्षित आहे का, हे स्वतः तपासून घेता येईल. अनेकदा आपल्याला अंडी किती जुनी आहेत हे कळत नाही. तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमान अंडी केवळ २ आठवडे चांगली राहतात. थंड तापमान (२ ते ८C) फ्रिजमध्ये ठेवल्यास ५ आठवड्यांपर्यंत अंडी वापरता येतात. त्यामुळे आता अंड्यांची एक्सपायरी डेट तुम्हाला समजू शकणार आहे. यानुसार, नियमावली तयार केली गेली आहे. जर एखाद्या दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांची अंडी जप्त केली जातील. ही अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा ती ‘मानवी सेवनासाठी असुरक्षित’ असल्याचे शिक्कामोर्तब केले जाईल. विभागाने कडक तपासणी मोहिमेचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशात सध्या आग्रा आणि झाशी येथे मुख्य शीतगृहे आहेत. अन्न सुरक्षा नियमांनुसार अंडी आणि भाज्या एकाच जागी ठेवता येत नाहीत. त्यामुळे, सुविधा मर्यादित असल्या तरी सरकारने आता कडक शब्दांत ताकीद दिली आहे की, ‘सुविधा नाही’ ही सबब चालणार नाही, नियमांचे पालन करावेच लागेल.
अंडी किती काळ टिकतात?:
- सामान्य तापमानात (३०° सेल्सिअस) : साधारण२ आठवडे.
- रेफ्रिजरेटरमध्ये (२ ते ८° सेल्सिअस) : साधारण५ आठवड्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतात.






