मुंबई : मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बससेवेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांत या बसचे तब्बल २४९ अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाले आहेत. दररोज सुमारे २२ ते २३ लाख प्रवासी बेस्टच्या २,८०१ बसमधून प्रवास करतात. पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी बेस्टने भाडेतत्त्वावर विद्युत एसी बस ताफ्यात दाखल केल्या असल्या, तरी या बसांच्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. बेस्टच्या एकूण २,८०१ बसपैकी २,५५३ बस या खासगी कंत्राटदारांमार्फत चालवल्या जात असून, केवळ २४९ बस बेस्टच्या मालकीच्या आहेत. या भाडेतत्त्वावरील बस शहरातील ४०० मार्गांपैकी ३४९ मार्गांवर दररोज २५,७०० हून अधिक फेऱ्या मारतात. त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक बस वाहतुकीचा मोठा भार या बसांवर आहे. मात्र, वाढत्या अपघातांमुळे ही सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मे महिन्यात सर्वाधिक ९९ अपघातांची नोंद झाली. त्यापूर्वी मार्चमध्ये ९६ आणि एप्रिलमध्ये ९२ अपघात घडले. जानेवारीत ८१ तर फेब्रुवारीत ४५ अपघात झाले. मृत्यूंच्या आकडेवारीत जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी तीन, मार्चमध्ये दोन आणि मे महिन्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
अलीकडील काही घटनांनी ही चिंता आणखी वाढवली आहे. ४ जून रोजी मालाडमध्ये एका भाडेतत्त्वावरील बसने ओला कॅब चालकाला धडक दिली. त्यानंतर ८ जून रोजी दादर परिसरात एका विद्युत बसने उभी असलेली क्रेन आणि टॅक्सीला धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. २४ जून रोजी कुलाबा डेपोमध्ये प्रवेश करताना एका बसने टॅक्सीला धडक दिली. ८ जुलै रोजी भांडुपमध्ये एका बसने अनियंत्रितपणे मागे जाऊन पुढे सरकत एका पादचाऱ्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर १० जुलै रोजी अंधेरी पश्चिम येथे मार्ग क्रमांक २४२ वरील बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिली. या वाढत्या अपघातांमागे तांत्रिक बिघाड, चालकांचे अपुरे प्रशिक्षण, निष्काळजी वाहनचालक, बसची नियमित देखभाल न होणे, एअर प्रेशर गळती, ब्रेक निकामी होणे आणि कंत्राटदारांकडून दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्वावरील बससेवेची सुरक्षा, वाहनांची तांत्रिक तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि कंत्राटदारांवरील देखरेख अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, कारण निष्पाप प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे.






