पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाला बसला आहे. शनिवार ते मंगळवार या कालावधीत विभागाच्या दैनंदिन उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. साधारणपणे दररोज २ कोटी १० ते २० लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या पुणे विभागाचे उत्पन्न मागील चार दिवसांत घटून सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांवर आले आहे. त्यामुळे दररोज सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबई–पुणे एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवावी लागली. पुण्याहून सकाळी मुंबईकडे रवाना झालेल्या बसेसही परत बोलावण्यात आल्या. द्रुतगती मार्गासह जुना मुंबई–पुणे महामार्ग बंद झाल्याने प्रवाशांसह एसटी महामंडळालाही मोठा फटका बसला. याशिवाय ताम्हिनी घाट आणि नाशिक मार्गावरील बससेवाही बंद करण्यात आली, तर कोकणातील प्रतिकूल हवामानामुळे महाड, माणगाव आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.
बुधवारीही अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तीन तालुक्यांतील बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. महाबळेश्वरकडे जाणारी बससेवा ३१ जुलैपर्यंत बंद राहणार असून, ताम्हिनी घाट तसेच कोकणातील काही मार्गांवरील सेवा अद्यापही स्थगित आहे. या परिस्थितीमुळे हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून एसटीच्या आर्थिक उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने बससेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित बससेवेची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





