नवी दिल्ली : दिल्ली सरकारने खंडित आणि जुन्या देवमूर्तींच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीत विविध ठिकाणी ‘मूर्ती संकलन केंद्र’ उभारण्याची घोषणा केली असून, या केंद्रांमध्ये नागरिकांना खंडित मूर्ती जमा करता येणार आहेत. त्यानंतर या मूर्तींचे धार्मिक परंपरांचा आदर राखून विसर्जन तसेच वैज्ञानिक पद्धतीने पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) केली जाणार आहे. मंगळवारी या योजनेची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सोशल मीडियावरील कमेंट बॉक्सच्या माध्यमातून योग्य ठिकाणांच्या सूचना देण्याचे आवाहन केले. सरकारकडून यासाठी सविस्तर धोरण आणि कार्ययोजना तयार केली जात असून, धार्मिक भावना आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, मूर्ती खंडित झाल्यानंतर अनेकदा त्या पिंपळाच्या झाडाखाली, नदीकिनारी, उद्यानांमध्ये किंवा रस्त्यांवर टाकल्या जातात. त्यामुळे धार्मिक भावनांचा अनादर होण्याबरोबरच स्वच्छता आणि पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होतो. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने संकलन केंद्रांची संकल्पना पुढे आणली आहे. या केंद्रांमुळे नागरिकांना मूर्ती योग्य पद्धतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यानंतर त्यांचे सन्मानपूर्वक व्यवस्थापन केले जाईल. दिल्ली सरकारने नागरिकांच्या सहभागातून ही योजना अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, संकलन केंद्रांसाठी योग्य जागा आणि व्यवस्थापन अधिक चांगले करण्याबाबत सूचना मागवल्या आहेत. “आस्थेचा सन्मान आणि दिल्लीची स्वच्छता या दोन्ही आमच्या जबाबदाऱ्या आहेत,” असेही मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नमूद केले.







