मुंबई : मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे , असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रेशनकार्ड धारक लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात असल्याचे समोर आल्यावर जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शासन आपल्या दारी या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात असणार असून या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशनकार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य पुरवले जाणार नाही असा धमकीवजा संदेश पसरवण्यात येत आहे. जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सरकारच्या या धमकीवर जयंत पाटील यांनी सरकारला सज्जड इशारा दिलाआहे.





