छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक भागांमध्ये, विशेषतः मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची घोषणा करत, केंद्र सरकारच्या आर्थिक मंजुरीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार आपल्या तिजोरीतून बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणार असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभागातील पीक नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, सोयाबीनचे पीक करपणे, शेंगांमध्ये दाणे न धरणे आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने आधार देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेत वेळ न घालवता प्राथमिक अहवालाच्या आधारेच मदत वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे, तेथे मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग राबवून शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. नियमित पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असली तरी त्याआधीच प्राथमिक अहवालाच्या आधारे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात राजकारण न करता सर्वांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना आर्थिक तसेच पीक विम्याच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.






