नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ३-० असा दणदणीत विजय मिळवला. मात्र, या मालिकेदरम्यान क्रिकेट तिकिटांच्या काळाबाजाराचा मोठा प्रकार उघडकीस आला. दिल्ली पोलिसांनी अरुण जेटली स्टेडियम परिसरात विशेष मोहीम राबवत अनधिकृतपणे तिकिटांची विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केली. या मोहिमेत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात एकूण १३ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून ७१ सामन्यांची तिकिटे आणि ७,४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डिकॉय ग्राहक पाठवून काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, एमजी मार्ग, बीएसझेड मार्ग, जेपीएन पार्क आणि स्टेडियम परिसरात संशयितांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. अधिकृत तिकिटे संपल्यानंतर क्रिकेटप्रेमी कोणत्याही किमतीत तिकिटे खरेदी करण्यास तयार असल्याचा फायदा घेत आरोपी कमी किमतीत मिळवलेली तिकिटे अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याचे तपासात समोर आले.
दिल्ली पोलिसांनी १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी सलग तीन दिवस ही मोहीम राबवली. पहिल्या सामन्यानंतर १४ सप्टेंबर रोजी चार एफआयआर दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २९ तिकिटे आणि ३,४०० रुपये जप्त करण्यात आले. दुसऱ्या सामन्यादरम्यान सहा एफआयआर नोंदवत १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३१ तिकिटे आणि ४,००० रुपये जप्त करण्यात आले. तिसऱ्या सामन्यानंतर १७ सप्टेंबर रोजी आणखी तीन एफआयआर दाखल करत चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ११ तिकिटे जप्त करण्यात आली. या सर्व आरोपींवर दिल्ली प्रिव्हेन्शन ऑफ टाउटिंग अँड मॅलप्रॅक्टिसेस अगेंस्ट टुरिस्ट्स अॅक्ट, २०१० च्या कलम ४(सी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रिकेट सामन्यांदरम्यान तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.






