नागपूर : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी ‘आदिवासी शाळा ठीक करा’ अभियानाची घोषणा केली आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती देत, १७ सप्टेंबर २०२६ पासून हे अभियान गडचिरोली जिल्ह्यातून सुरू होणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत दिपके यांनी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीचा हवाला देत, २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये ५८४ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही सरासरी दररोज एका विद्यार्थ्याच्या मृत्यूसमान असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. सर्पदंश, विविध आजार, अपघात आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हे मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, अशा घटना मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांत घडल्या असत्या तर देशभर मोठी प्रतिक्रिया उमटली असती, असा आरोप करत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई मिळाली नसल्याचाही दावा त्यांनी केला.
या अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक आदिवासी निवासी शाळेचे पुढील तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी प्रमुख मागणी CJP ने केली आहे. तसेच गेल्या १० वर्षांतील आदिवासी निवासी शाळांमधील मृत्यूंची राज्यनिहाय माहिती देणारा सार्वजनिक डॅशबोर्ड तयार करावा, विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, सकस आहार, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके यांनी स्वातंत्र्यानंतरच्या ८० वर्षांत आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेची सातत्याने उपेक्षा झाल्याचा आरोप केला. तसेच देशातील ७२० एकलव्य मॉडेल निवासी शाळांपैकी ४७७ शाळा अकार्यक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय आदिवासी वसतिगृहे एका खासगी ट्रस्टकडे सोपवण्यासंदर्भातील सामंजस्य कराराला (MoU) विरोध दर्शवत त्यांनी त्याची प्रत पत्रकार परिषदेत फाडून निषेध नोंदवला. हे अभियान CJP च्या यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘शाळा ठीक करा’ या देशव्यापी उपक्रमाचा विस्तार असून, आता ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.






