मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठे पाऊल उचलले आहे. शहर आणि उपनगरांमध्ये अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेकडून तब्बल ७६ अतिक्रमण निर्मूलन वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून, या वाहनांच्या मदतीने फेरीवाले व इतर अनधिकृत अतिक्रमणांवर अधिक प्रभावी कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण हटवताना जप्त केलेले साहित्य वाहून नेण्यासाठीही ही वाहने वापरली जाणार आहेत. शहर विभागासाठी २७ वाहने, तर पश्चिम उपनगरांसाठी ४९ वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहर विभागातील वाहनांची सेवा ९,८५५ पाळ्यांसाठी घेतली जाणार असून, त्यासाठी इन्झफ्रा ट्रान्सप्रोजेक्ट्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. प्रति पाळी ₹३,०५० या दराने या सेवेसाठी सुमारे ₹३.१२ कोटींचा खर्च होणार आहे.
पश्चिम उपनगर विभागासाठी १७,८८५ पाळ्यांमध्ये वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठी एस. डी. शिरोळे ट्रान्सपोर्ट कंपनीची निवड करण्यात आली आहे. प्रति पाळी ₹३,०४२ या दराने या सेवेसाठी सुमारे ₹५.६५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अनुज्ञापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी ही वाहने वर्षभर अखंडितपणे कार्यरत राहणार आहेत. विशेषतः पदपथांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई, जप्त साहित्याची वाहतूक आणि सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाणार आहे. अतिक्रमणमुक्त पदपथ अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही वाहने अत्यावश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले असून, या निर्णयामुळे मुंबईतील अतिक्रमणविरोधी मोहिमेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





