नवी मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त खारघर येथील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिरात यंदा भव्य आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध सोहळे पार पडणार आहेत. मंदिराचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा उत्सव केवळ जन्माष्टमीपुरता मर्यादित नसून, भक्ती, संस्कृती आणि समाजप्रबोधन यांचा संगम घडवणारा ठरणार आहे. उद्घाटनानंतर अल्पावधीतच खारघर येथील इस्कॉन मंदिराने नवी मुंबईतील प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली असून, यंदाच्या उत्सवासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात २३ ते २८ ऑगस्टदरम्यान झुलन यात्रेने होणार असून, दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या झुलन उत्सवासह कीर्तन, भजन, हरिनाम संकीर्तन आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी बलराम जयंती (बलराम पौर्णिमा) भक्तिभावाने साजरी करण्यात येणार असून, त्यानंतर २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत श्रावण उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात दररोज सायंकाळी ७.३० ते ९ या वेळेत श्रीकृष्ण कथा, भागवत प्रवचने, हरिनाम संकीर्तन तसेच देशभरातील नामवंत वक्त्यांची आध्यात्मिक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमांद्वारे भक्तांना श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राचा, भगवद्गीतेतील विचारांचा आणि भक्तिमार्गाचा सखोल परिचय करून दिला जाणार आहे. ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाणार असून, मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता कलशदात्यांसाठी विशेष कलश अभिषेक होईल. त्यानंतर रात्री ११ वाजता महाअभिषेक, मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाच्या जन्मक्षणी महाआरती, उत्साही कीर्तन आणि महाप्रसाद वितरणाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. विशेष दर्शनासाठी दाते आणि आजीवन सदस्यांना त्यांच्या सदस्यत्वानुसार स्वतंत्र प्राधान्य रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना सुरळीत आणि सुलभ दर्शन घेता येईल. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, रोषणाई आणि धार्मिक देखाव्यांनी सजविण्यात येणार असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी इस्कॉनचे संस्थापक-आचार्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा १३० वा प्रकटदिन विशेष कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी विशेष प्रार्थना, कलश अभिषेक, आध्यात्मिक प्रवचने आणि महाप्रसाद वितरण आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी परमपूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज यांची व्यासपूजा, तसेच १९ सप्टेंबर रोजी राधाष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. खारघर येथील इस्कॉन कॅम्पसमध्ये नुकतेच सुरू करण्यात आलेले दशावतार मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि देशी गायींच्या संवर्धनासाठी उभारलेली आधुनिक गोशाळा ही भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस, स्वयंसेवक, आरएसएस स्वयंसेवक, उत्सव समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातून विशेष गर्दी नियंत्रण व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक, पार्किंग, दर्शन रांगा, सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मित्तल आणि सचिव राजेश तिवारी यांनी भाविकांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंदिराचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा, श्रीकृष्ण कथा ऐकण्याची, हरिनाम संकीर्तनात सहभागी होण्याची आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याची एक आध्यात्मिक संधी असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व भाविकांनी आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांसह या उत्सवात सहभागी होऊन भगवान श्रीकृष्ण तसेच श्री श्री राधा मदनमोहनजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन केले. आयोजकांच्या मते, यंदाचा जन्माष्टमी महोत्सव भक्ती, संस्कृती, सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा अविस्मरणीय सोहळा ठरणार असून, नवी मुंबईसह राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






