मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भारतासह मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करणारी एक संशयास्पद पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. ‘@AstroPrashnath9’ या हँडलवरून इंग्रजीत करण्यात आलेल्या पोस्टमध्ये ऑगस्ट २०२६ मधील ९ ते १८ ऑगस्ट हा कालावधी भारतासाठी अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा करण्यात आला असून, या काळात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या पोस्टला कोणतेही अधिकृत किंवा पडताळलेले पुरावे जोडलेले नसतानाही ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाली. स्वातंत्र्यदिन जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. एका सतर्क नागरिकाने ही पोस्ट मुंबई पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलला टॅग करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने तातडीने तपास सुरू केला असून संबंधित खाते कोण चालवत आहे, ते कुठून कार्यरत आहे, या पोस्टमागे कोणतेही विश्वसनीय गुप्तचर इनपुट आहेत का, की समाजात भीती आणि अफवा पसरविण्याचा प्रयत्न आहे, याची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. या टप्प्यावर पोलिसांनी कोणत्याही संभाव्य हल्ल्याची अधिकृत पुष्टी केलेली नसून, व्हायरल पोस्टची सत्यता तपासली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना, सरकारी इमारतींना, विमान सेवांना तसेच प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करणारे अनेक धमकीचे फोन, ई-मेल आणि खोटे संदेश समोर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच सतर्क आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विशिष्ट तारखांचा उल्लेख असलेली ही पोस्ट समोर आल्यानंतरही पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेत तपास अधिक तीव्र केला आहे. शहरातील सुरक्षाव्यवस्थेचा नियमित आढावा घेतला जात असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात येत आहे. मात्र, केवळ सोशल मीडियावरील दाव्यांच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे. भीतीदायक पोस्ट, संदेश किंवा ई-मेल पडताळणी न करता पुढे पाठवू नयेत, कारण अशा अफवांमुळे अनावश्यक घबराट निर्माण होऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच पुढील माहिती दिली जाईल, असे प्रशासनाने नमूद केले आहे. दरम्यान, नागरिकांनी अधिकृत शासकीय आणि पोलिसांच्या माध्यमातूनच माहिती घ्यावी, शांतता राखावी आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






