सातारा : सासवड–जेजुरी मार्गावर झालेल्या वारकऱ्यांच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. १५ जुलै रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून १८ जुलैपर्यंत पालखी जिल्ह्यात मुक्काम करणार आहे. या कालावधीत वारकऱ्यांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, पाकीटमारी, चोऱ्या, महिलांची छेडछाड आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असून आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. अशा प्रकारे एकूण ४० सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालखी सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी कोणत्याही समाजकंटकांना संधी दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी, महिलांशी गैरवर्तन किंवा इतर गुन्हे करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस अंमलदार, ९७ महिला पोलीस अंमलदार, १,१०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड, ७५ वाहतूक पोलीस, दोन आरसीपी प्लाटून तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचा समावेश आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांतून १८ अधिकारी, ३२० पोलीस अंमलदार आणि एसआरपीएफची अतिरिक्त तुकडीही मागविण्यात आली आहे. या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पालखी मार्गावर बेजबाबदारपणे किंवा भरधाव वेगाने वाहन चालवून वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयास्पद हालचाली किंवा कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सातारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






