मुरुड जंजिरा : जंजिरा किल्ला हा ऐतिहासिक समुद्र किल्ला मंगळवार, २६ मे २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात येणार आहे. समुद्रातील वाढता लाटांचा जोर, वादळी वारे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या शेवटच्या शनिवार-रविवारी किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, कल्याण, डोंबिवली, बोरिवलीसह राज्यातील विविध भागांतून हजारो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत असतात. सध्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणि तिकीट काउंटरवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर समुद्रातील लाटा उंचावल्याने शिडाच्या बोटी मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत आहेत. त्यामुळे किल्ल्यावर उतरताना पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी किल्ल्यावर उतरण्यासाठी नवीन जेट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही जेट्टी किल्ल्याच्या मागील बाजूस असून ती सुमारे ५०० मीटर अंतरावर असल्याने पर्यटकांना पायी चालत जावे लागते. जेट्टीवर सावलीसाठी शेड नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत. किल्ल्यावर वाढत्या गर्दीमुळे अनेक पर्यटक शिडाच्या बोटींमधून किल्ल्याला प्रदक्षिणा घालून बाहेरूनच त्याचे दर्शन घेण्यात समाधान मानत आहेत. शनिवार-रविवारची सुट्टी लक्षात घेता पुढील दोन दिवसांत पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, २६ मेपासून बंद होणारा हा किल्ला सप्टेंबर महिन्यात पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.







