नवी दिल्ली : Council for the Indian School Certificate Examinations (सीआयएससीई) तर्फे घेण्यात आलेल्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. देशभरात दहावीचा निकाल ९९.१८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.१३ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. दहावीमध्ये मुलींचा निकाल ९९.४६ टक्के, तर मुलांचा ९८.९३ टक्के आहे. बारावीमध्येही मुलींचा निकाल ९९.४८ टक्के असून मुलांचा निकाल ९८.८१ टक्के इतका आहे. आयसीएसई परीक्षेत ६७ विषयांचा समावेश होता, ज्यात २० भारतीय आणि १४ परदेशी भाषा होत्या. तर आयएससी परीक्षेत ४५ विषयांमध्ये १३ भारतीय आणि २ परदेशी भाषांचा समावेश होता. देशभरातून दहावीच्या परीक्षेला २.५८ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २.५६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या परीक्षेला १.०३ लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १.०२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रादेशिक निकालांमध्ये आयसीएसई परीक्षेत पश्चिम विभागाने ९९.८५ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळवले, तर दक्षिण विभाग ९९.८१ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आयएससी परीक्षेत दक्षिण विभागाने ९९.८७ टक्क्यांसह पहिला क्रमांक पटकावला, तर पश्चिम विभागाचा निकाल ९९.५५ टक्के लागला. महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यातून आयसीएसई परीक्षेला ३०,३९३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ३०,३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९९.९३ टक्के लागला आहे. तसेच आयएससी परीक्षेत ४,०६१ विद्यार्थ्यांपैकी ४,०५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींचा निकाल ९९.९५ टक्के, तर मुलांचा निकाल ९९.७९ टक्के इतका आहे. एकूणच, देशासह महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.






