मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दुपारनंतर हवामान अचानक बदलण्याची शक्यता असल्याने बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली, मोकळ्या जागेत किंवा पाण्याजवळ थांबणे टाळावे, तसेच लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मोकळ्या जागेत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाच्या स्तरावर ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग यांना जनजागृती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शाळा व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकरी बांधवांनी या कालावधीत शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज थांबवावे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.







