पुणे : ‘बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही, तर गावात जशी कुत्री भटकतात, तसे बिबटे भटकतील,’ अशी चिंता व्यक्त करून वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपायांची माहिती देताना आफ्रिकेतही बिबटे पाठविणार असल्याचे बुधवारी सांगितले.
पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे (वय ५), रोहन बोंबे (वय १३) या मुलांचा, तसेच जांबूत येथील भागूबाई रंगनाथ जाधव या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शिरूर तालुक्यात आतापर्यंत बाराहून अधिक नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी पिंपरखेड गावाला भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. नाईक म्हणाले, पुणे जिल्ह्यात बिबटे पकडण्यासाठी १२०० पिंजरे देण्यात येणार आहेत. त्यातील २०० पिंजरे देण्यात आले आहेत. बिबट निवारण केंद्रातील बिबटे घेऊन जाण्यास गुजरातमधील ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. नसबंदी हाही एक उपाय अमलात आणण्यात येणार आहे. आफ्रिकेत सिंह आहेत, इतर काही प्राणी आहेत. मात्र, तिथे बिबटे नाहीत. तेथेही बिबटे पाठविण्य़ात येणार आहेत.







