मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे १७ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांची एकूण किंमत सुमारे ₹३४,००० कोटी असून, त्यातून राज्यात जवळपास ३३,००० रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण तसेच संबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकण या सर्व भागांमध्ये उद्योग उभारणीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. आम्ही केवळ करारावर स्वाक्षरी करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील आणि कुठेही अडथळा येऊ देणार नाही. राज्यात नुकताच ५ वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला आहे. यामुळे विजेचे दर वर्षागणिक कमी होतील. पूर्वी दरवर्षी वीजदर सुमारे ९% वाढत असत; परंतु आता दर कमी होणार असल्याने उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल.
उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचे जीवनचक्र स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होईल. मैत्री पोर्टल च्या माध्यमातून उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंत्री उदय सामंत व संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.







