पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी कडक उन्ह तर कधी अवकाळी पाऊस होत असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याचे दिसून आले. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात या पावसाने शेतीच्या पिकांसह आंबा-केळी-द्राक्ष बागांचेही नुकसान झाले आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी जळगाव तालुक्यासह जामनेर, पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कापूससह कडबा जळाला आहे. प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली. त्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. या अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या मका, बाजरीसह विविध पिकांचे नुकसान झाले. जळगाव जिल्हयात अनेक तालुक्यांमध्ये सोमवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला. त्यानंतर अवकाळी पाऊस सुरु झाला. दिवसभर कडाक्याचे ऊन अन् रात्रीच्या वेळी वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.







