नवी दिल्ली : देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर जवानांचा सन्मान करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांना आता आयुष्यभर रेल्वेने मोफत प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, या वीरांना त्यांच्या कुटुंबियांसह हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार, शौर्यपदक विजेते रेल्वेच्या First Class, 2AC आणि AC Chair Car या श्रेणींमधून विनामूल्य प्रवास करण्यास पात्र असतील. विशेष म्हणजे, या वीर सैनिकांना एकट्याने प्रवास करण्याची गरज नाही; त्यांना त्यांच्यासोबत १ सहप्रवाशाला नेण्याची मुभा देण्यात आली आहे. ही सुविधा त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे.
सरकारने या सुविधेची व्याप्ती केवळ सैनिकांपुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत विस्तारली आहे. शौर्यपदक विजेत्यांचे पती किंवा पत्नी (विधवा/विधुर, ज्यांनी पुनर्विवाह केला आहे अशांसह) या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. ज्या अविवाहित सैनिकांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशा जवानांचे आई-वडील देखील या आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवासासाठी पात्र ठरतील.केंद्र सरकारचे हे पाऊल देशासाठी असीम त्याग करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम मानले जात आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश केवळ सुविधा देणे हा नसून, वीर जवानांच्या कुटुंबियांना सामाजिक आणि आर्थिक पाठबळ देणे हा आहे. सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा एक भाग आहे. अशा प्रकारच्या कल्याणकारी योजनांमुळे सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या जवानांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल. तसेच, देशाची सेवा करण्यासाठी भारतीय संरक्षण दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय अत्यंत प्रेरणादायी ठरेल. आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे.






