मुंबई : मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी असून सध्या धरणांमध्ये केवळ ४ लाख ५३ हजार ५५० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. झोपडपट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेली पाण्याची उधळपट्टी, अनेक ठिकणी सुरु असलेल्या पाण्याचा अमर्याद वापर, वारंवार जलवाहिन्यांतून होत असलेली गळती, चोरी आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणात ३५.४८ टक्के, मोडकसागरमध्ये २२.४० टक्के, तानसामध्ये २४.८४ टक्के, मध्य वैतरणा धरणात ३७.३९ टक्के, भातसामध्ये ३०.७५ टक्के, विहारमध्ये ४२.६९ टक्के, तुळशी धरणात ४२.३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.






