सोलापूर : वारकरी सांप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढ महापर्वानिमित्त १५ लाखांवर विठ्ठलभक्त टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत शनिवारी पंढरीत दाखल झाले. इसबावी येथील पादुका मंदिराजवळ सर्व संतांच्या मांदियाळीला श्री क्षेत्र पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी संत नामदेव महाराज शनिवारी दुपारी १२ वाजता येऊन दाखल झाले. आपण आल्याची दवंडी त्यांनी सर्व मानाच्या पालख्यांना दिली आणि दुपारी एक वाजता संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. सुमारे १५ लाख विठ्ठल भक्तांचा जणू पंढरीस महापूरच आला आहे. आषाढी एकादशीच्या महापर्वाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उभयतांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.
मंदिर समितीने महापूजेची संपूर्ण तयारी केल्याचीही माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी माऊलींचे दर्शन घेतले. वाखरी तळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माऊलींचे दर्शन घेतले व पालखीला खांदा दिला. शनिवारी सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा पुरंदरे मळ्याजवळ पोहोचल्यानंतर माऊलीची पालखी मुख्य रथातून भाट्यांच्या रथात ठेवण्यात आली. भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. आषाढी शुद्ध एकादशीनिमित पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पांडुरंगाकडे राज्यावरील संकटे दूर होऊ देत, शेतकऱ्यांचे भले व्हावे, चांगले काम करण्याची ताकद द्यावी, असे साकडे पांडुरंगाला घातले.