मुंबई : राज्यात अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत सुरू असलेल्या कठोर मोहिमेला आता पश्चिम रेल्वेनेही अधिक गती दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर रेल्वे प्रशासनानेही स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची सखोल तपासणी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवरील स्टॉल्समध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर तातडीची कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे स्थानकावरील तब्बल ११ स्टॉल्स बंद करण्यात आले असून, त्याशिवाय ग्रँट रोड येथील ४, लोअर परेल येथील ३, चर्नी रोड येथील २ आणि मरीन लाइन्स येथील २ स्टॉल्सही बंद करण्यात आले आहेत. तपासणीत अनेक ठिकाणी विक्रीस ठेवलेले खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे, स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे नसल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही स्टॉल्सवर छोले, समोसे, वडे यांसारखे तत्काळ खाण्यासाठीचे पदार्थ विकले जात होते. मात्र हे पदार्थ सुरक्षित आणि दर्जेदार नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी स्वयंपाक आणि साठवण व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय तपासणीची अनिवार्य प्रमाणपत्रे नव्हती. उदाहरणार्थ, एका स्टॉलवर ४ कर्मचारी कार्यरत असताना त्यापैकी केवळ २ कर्मचाऱ्यांकडेच वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध होते. या त्रुटी अत्यंत गंभीर मानत संबंधित स्टॉल्स तात्पुरते बंद करण्यात आले असून, सर्व दोष दूर करण्यासाठी त्यांना निश्चित मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी फक्त पॅकबंद खाद्यपदार्थांची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या इतर स्थानकांवरील स्टॉल्सचीही तपासणी सुरू असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्यावरही तत्काळ कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही स्टॉल्सवर बंदीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षेत्रात उपनगरीय स्थानकांवर एकूण २९२ खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाची ७ केंद्रे तसेच २ रेल्वे डब्यांमधील खाद्यसेवा केंद्रे अशा मिळून एकूण ३०१ खाद्यविक्री केंद्रांचे जाळे कार्यरत आहे. रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की अधिकारी आणि पर्यवेक्षकांकडून या सर्व केंद्रांची नियमित तसेच अचानक तपासणी केली जाते. रेल्वेच्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै या कालावधीत तब्बल १,५२३ तपासण्या करण्यात आल्या आहेत. मात्र इतक्या तपासण्या झाल्यानंतरही अनेक स्टॉल्समध्ये स्वच्छतेचा अभाव, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांतील त्रुटी मोठ्या प्रमाणात आढळल्याने रेल्वेच्या देखरेख व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने सर्व स्टॉलधारकांना स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. एका स्टॉलवरील कर्मचाऱ्याने सांगितले की, भविष्यात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली असून स्वच्छता राखणे आणि दर्जेदार अन्न देणे आता अत्यावश्यक करण्यात आले आहे. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्टॉल्सवर कोणतीही दया दाखवली जात नसून दोष आढळताच थेट कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी आवश्यक परवानग्या, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि स्वच्छतेचे नियम पूर्णपणे पाळण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, येत्या काही दिवसांत पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर अशाच प्रकारची व्यापक तपासणी सुरू राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही स्टॉलवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. अशा मोहिमेमुळे रेल्वे स्थानकांवरील अन्नाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा ठरेल.





