नागपूर : महाराष्ट्राला जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि पाणी संवर्धनाबाबत अधिक जागरूक बनवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या राज्यव्यापी अभियानाला आता बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांची साथ लाभली आहे. जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत संजय दत्त यांनी या उपक्रमात सहभागी होण्यास होकार दिला आहे. त्यामुळे या अभियानाला राज्यभरात मोठे आकर्षण प्राप्त झाले असून, विशेषतः युवकांमध्ये जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दिशा देणारे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा केला जात असून, १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर व्यापक ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातील सर्वात महत्त्वाचा आणि जनसहभागावर आधारित उपक्रम म्हणजे ‘महा वॉकेथॉन २०२६’ होय. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता एकाच वेळी ही वॉकेथॉन आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त ३ किलोमीटर अंतराची पदयात्रा आयोजित करण्यात येणार असून, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कला, साहित्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि लाखो नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वॉकेथॉन पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी नागरिक माती आणि जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतील. पाणी वाचविणे, पावसाचे पाणी अडविणे, भूजल पातळी वाढविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे हा या शपथेचा मुख्य संदेश असणार आहे. मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच हा उपक्रम केवळ सरकारी कार्यक्रम न राहता लोकचळवळ बनावा, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. हवामान बदल, अनियमित पाऊस, दुष्काळ, भूजल पातळीत होणारी घट आणि वाढते जलसंकट लक्षात घेता नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संजय दत्त यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्याच्या सहभागामुळे या अभियानाला अधिक व्यापक प्रसिद्धी मिळेल आणि पाणी संवर्धनाचा संदेश राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शासनाच्या वतीने अधिकृत ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या पहिल्या दहा सहभागींचा गौरवचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे. याशिवाय प्रायोजकांच्या सहकार्याने आकर्षक रोख पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवडलेल्या विजेत्यांपैकी प्रथम क्रमांकाला २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच २५ सहभागी नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपयांची विशेष रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून या अभियानांतर्गत जलसंधारण विषयावरील रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पाण्याचा योग्य वापर या विषयांवर उत्कृष्ट रील तयार करणाऱ्या स्पर्धकांनाही याच धर्तीवर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शासनाने केले आहे. जलसंधारणाची ही चळवळ प्रत्येक गाव, शहर आणि घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत असून, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य हेतू आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या ब्रीदवाक्याखाली राबविण्यात येणारी ही राज्यव्यापी मोहीम केवळ एक पदयात्रा नसून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनतेला एकत्र आणणारी लोकचळवळ ठरणार आहे. संजय दत्त यांच्या सहभागामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळणार असून, लाखो नागरिकांच्या सहभागातून महाराष्ट्रात जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने ‘महा वॉकेथॉन २०२६’ हा एक ऐतिहासिक उपक्रम ठरेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.






