मुंबई : दादर पश्चिम येथील ४६ वर्षे जुन्या स्वातंत्र्यवीर सावरकर महापालिका मंडईच्या बहुप्रतीक्षित दुरुस्तीला अखेर गती मिळाली असून, या कामासाठी मुंबई महापालिका सुमारे २ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. दादरमधील सर्वांत मोठी घाऊक मंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडईची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. उंदीर आणि घुशींच्या वाढत्या वावरामुळे मंडईत अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. सहाय्यक आयुक्त (बाजार) यांच्या अखत्यारीतील या मंडईची २०२२ मध्ये संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. मेसर्स रेट्रो फिटर्स कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांनी केलेल्या तपासणीनंतर मंडईला ‘सी-२’ अर्थात धोकादायक प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले आणि तातडीने मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. यापूर्वी खासगी विकासकाच्या माध्यमातून मंडईचे पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे आले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी त्यास तीव्र विरोध केल्यानंतर महापालिकेने पुनर्विकासाऐवजी दुरुस्तीचा मार्ग स्वीकारला. या मंडईत सुमारे ३०० किरकोळ आणि घाऊक विक्रेते व्यवसाय करतात. सुरुवातीला या कामासाठी सुमारे २ कोटी ३६ लाख ९६ हजार ७६९ रुपयांचा अंदाज तयार करण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे तीन कंत्राटदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले असून, सर्वात कमी दर देणाऱ्या मेसर्स विकास एन्टरप्राईसेस या कंपनीची कामासाठी निवड करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासन या दुरुस्ती कामासाठी सर्व करांसह एकूण २ कोटी ९४ लाख २६ हजार ८८ रुपयांचा खर्च करणार असून, काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासह १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या दुरुस्तीअंतर्गत मंडईच्या छतासाठी नवीन गॅल्व्हॅल्युम पत्रे बसविणे, त्यासाठी आवश्यक लोखंडी आणि लाकडी ट्रस उभारणे, लोखंडी कॉलम उभारून काँक्रिटची पायाभरणी करणे, रेन वॉटर गटरची दुरुस्ती, प्लंबिंग व ड्रेनेजची सुधारणा, विद्युत यंत्रणेचे नूतनीकरण, सिमेंट गिलावा, रंगकाम, वीट बांधकाम, प्लास्टिक पाण्याची टाकी बसविणे, लोखंडी गेट व जाळी बसविणे, लाद्या, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती, स्टीलची कामे तसेच वाळवी प्रतिबंधक उपाययोजना अशा विविध कामांचा समावेश आहे. या दुरुस्तीमुळे मंडईची सुरक्षितता वाढण्याबरोबरच व्यापारी आणि ग्राहकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






