पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी २.३० वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पहाटेपासूनच धार्मिक विधी, महापूजा, कीर्तन आणि हरिनामाच्या गजराने देहू नगरी दुमदुमून गेली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला. पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पालखी सोहळा प्रमुख आणि मंदिर विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची विधिवत महापूजा पार पडली. देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा अखंड सुरू ठेवण्यात नारायण महाराजांचे मोठे योगदान मानले जात असल्याने त्यांच्या समाधीस्थळीही भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळी ९ ते ११ या वेळेत संत तुकाराम महाराजांच्या आजोळ असलेल्या इनामदार वाड्यात पादुकांची महापूजा झाली, तर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. अभंग, टाळ-मृदंग आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषाने देहू नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. यंदाच्या पालखी सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर परिसर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने दर्शन व्यवस्था आणि पालखी सोहळ्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने केल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, यंदाच्या वारीवर मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. देहूतील पवित्र इंद्रायणी नदीला पूर आल्याने नदीची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा वर गेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा इंद्रायणी नदीत स्नान करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. दरवर्षी हजारो वारकरी नदीत स्नान करून वारीला प्रारंभ करतात, मात्र यंदा वाढलेल्या पाण्यामुळे कोणताही धोका पत्करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नदीकिनारी आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणालाही नदीपात्रात किंवा नदीकाठी जाण्याची परवानगी दिली जात नाही. प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवकांकडून वारकऱ्यांना सातत्याने सुरक्षाविषयक सूचना दिल्या जात आहेत. इंद्रायणीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली असून वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सुरक्षिततेचा समतोल राखत संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.







