मुंबई : मुंबईतील वांद्रे–कुर्ला संकुलात (बीकेसी) दर शुक्रवारी स्वैच्छिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबविण्यात येत असून, शुक्रवारी या उपक्रमाचा पहिला सार्वजनिक वाहतूक दिन पाळण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीतील सर्व संस्था, कंपन्या तसेच कामानिमित्त दररोज येथे येणाऱ्या सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमामागील उद्दिष्ट बीकेसीतील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे, प्रदूषण नियंत्रणात आणणे आणि इंधन वापरावर मर्यादा आणणे हे होते. मात्र या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि पहिल्याच दिवशी बहुतांश कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे वैयक्तिक वाहनांचा वापर करून कार्यालय गाठणे पसंत केले. बीकेसी परिसरात शुक्रवारीही नेहमीप्रमाणेच वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली आणि सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी मेट्रो, बेस्ट बस, रेल्वे तसेच रिक्षा-टॅक्सी यांसारख्या सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा वापर करणे अपेक्षित होते. एमएमआरडीएने बीकेसीतील विविध संस्था, कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. काही संस्थांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून बीकेसी प्रॉपर्टीज असोसिएशन, सेबी, नमन ग्रुप आणि डायमंड मार्केट यांसारख्या काही घटकांनी उपक्रमात सहभाग नोंदवला. तरीदेखील एकूण परिस्थितीत फारसा बदल दिसून आला नाही आणि परिसरातील वाहतूक प्रवाह पूर्वीप्रमाणेच राहिला. बीकेसी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असले तरी येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे, तसेच उपलब्ध सार्वजनिक वाहतूक पर्याय अपुरे असल्याची तक्रारही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते. कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्थानकांपासून बीकेसीचे अंतर, तसेच मेट्रो ३ (आरे ते कफ परेड) मार्गिकेचे स्थानक मुख्य रस्त्यावर असले तरी अनेक कार्यालये तेथून दूर असल्याने शेवटच्या टप्प्यातील प्रवासासाठी रिक्षा आणि टॅक्सीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करणे अधिक सोयीस्कर असल्याचे मानून त्यालाच प्राधान्य दिले. या परिस्थितीत एमएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी मात्र सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. दरम्यान, बीकेसीतील केंद्र सरकारच्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर मर्यादा असल्याचे संबंधित कार्यालयांकडून सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सक्षम नसल्याने आणि शेवटच्या टप्प्यातील प्रवासासाठी पुन्हा रिक्षा-टॅक्सीचा आधार घ्यावा लागत असल्याने वैयक्तिक वाहनांचा वापर अधिक सोयीचा ठरत असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाहतूक वाढविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असले तरी त्याआधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे होते. एकूणच या उपक्रमाचे सर्व स्तरांवर कौतुक झाले असले तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही, असे चित्र शुक्रवारी बीकेसी परिसरात पाहायला मिळाले.






