वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर त्याने अनेक विक्रम केले आणि मोडले. विराटने आपल्या कारकिर्दीतील ७६वे शतक झळकावले आहे. तसेच विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने ५५ महिन्यांनंतर परदेशी भूमीवर शतक झळकावले आहे. यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमही झाले आहेत.
विराट कोहलीने आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना शतक झळकावून संस्मरणीय बनला. विराट कोहलीने आपले २९ वे कसोटी शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर विराटने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी ही आपल्या कसोटी कारकीर्दीत २९ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराटच्या शतकामुळे पहिल्या डावात ४३६ धावा करता आल्या. भारतीय संघाने नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना पहिल्या डावात १२८ षटकांत ४३८ धावा करता आल्या. या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २०६ चेंडूचा सामना करताना ११चौकारांच्या मदतीने १२१ धावांची दमदार खेळी. या खेळीनंतर विराट कोहली धावबाद झाला. यानंतर जडेजाने कसोटी कारकिर्दीतील १९वे अर्धशतकही झळकावले. जडेजाला अर्धशतकाचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तो १५२ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. कोहली आणि जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक झळकावले. तो ८ चौकारांच्या मदतीने ७८ चेंडूंत ५६ धावा करून बाद झाला. तत्पुर्वी पहिल्या दिवशी रोहित शर्माने ८०, रवींद्र जडेजाने ६१, तर यशस्वीने ५७ धावांचे योगदान दिले. रॉच आणि वॅरिकन यांच्याशिवाय वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने दोन बळी घेतले. त्याचवेळी शॅनन गॅब्रिएलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्ट इंडिज संघानेही १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या.