पुणे : दिवाळीच्या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १६ दिवसात रेल्वेने तब्बल २२ हजार ८४३ फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांना तुडूंब गर्दी होती. प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेने काही विशेष गाड्या देखील सोडल्या होत्या. रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी विना तिकिट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक आणि तिकीट तपासणीस (टीसी) यांची नेमणूक केली होती. त्यानुसार दिवाळीच्या अगोदर व दिवाळीतील काही दिवस अशा १६ दिवसांमध्ये रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणारे २२ हजार ८४३ प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून एक कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत पुणे रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी सांगितले, की दिवाळीमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. प्रवाशांनी प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा. पुणे विभागात रेल्वेची ५६ स्थानके असून, या स्थानकांवरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र, दिवाळी काळात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत, काही प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले. रेल्वे प्रशासनाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत तिकीट तपसणीसांमार्फत विशेष तिकीट तपासणी मोहिम हाती घेतली होती.
विनातिकीट प्रवास – १६९६३ -एक कोटी ४७ लाख १३९
योग्य तिकीटाशिवाय प्रवास – ५७८१- ३५ लाख ३९ हजार
बेकायदा सामानाची वाहतूक – ९९ -११ हजार ६३९
एकूण केसेस – २२८४३ -एक कोटी ८२ लाख ९७ हजार