मुंबई : काँक्रिटीकरण वाढत असलेल्या मुंबईत येत्या काळात हिरवळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने वर्षभरात मुंबईमध्ये नवीन २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आज, सोमवारी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त दिवसभरात पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रात २००पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबत, वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत. मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून नवीन उपक्रम हाती घेतले जातात. अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाचे कार्य सुरू असल्याने मुंबईकरांच्या अवतीभोवती वृक्षराजी दाटलेली आढळत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. वृक्षसंपदा वाढविण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशनकडून ‘जागतिक वृक्ष नगरी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्षे मुंबई महानगराला मिळाला आहे.
मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पालिका विविध उपक्रम हाती घेत असते. यंदाही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्यान विभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचा एक भाग २५ हजार वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने आतापर्यंत मियावाकी पद्धतीने चार लाखापेक्षा अधिक झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे आज मुंबईच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योगिक जमिनींवर तसेच महानगरातील विविध उद्यानांमध्ये आणि रस्त्यांभोवती बहरलेली आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये गुरफटलेल्या मुंबईकरांना गारवा मिळावा, घराबाहेर पडल्यावर शीतल छाया मिळावी म्हणून पालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसीत केली आहेत. सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १,०६८ उद्याने आहेत. याठिकाणी बहरलेली वृक्षसंपदा, तेथील हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट मुंबईकरांना आनंद देऊन जातो. या १,०६८ ठिकाणांवर उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, पार्क आणि इतर मोकळ्या जागा विकसित आहेत.