मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. शिंदे सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ मोठ मोठे इव्हेंट करत आहे, अशी घणाघाती टिका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्यापही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी टिका थरात यांनी केली.
लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमच्या पक्षाने दोन दिवसांची बैठक घेतली. सदर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपाचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे अशा जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे, जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेचा कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसला. आता दुसरी पदयात्रा काढत असतील तर त्याचाही नक्कीच फायदा होईल. राहुल गांधी यांच्या पदयात्रेने इतिहास घडवला आहे. पदयात्रेत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा झाली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी- कष्टकरी यांच्या समस्यांवर चर्चा झाली आणि हेच राज्यातील निवडणुकीमधिल मुद्दे आहेत. असेही थोरात यांनी स्पष्ट केले.