मुंबई : भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन व विजेच्या मागणी-पुरवठ्यामध्ये संतुलन साधण्याचा भाग म्हणून वीजनिर्मिती क्षेत्रातील कालसुसंगत सौर, पवन आणि नवकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारने महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम यांच्याशी ५,२२० मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे करार बुधवारी केले. यातून ४१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारशे एकर परिसरात १०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. राहुरी विद्यापीठाची विद्युत देयके कमी करण्यासाठी ‘महानिर्मिती’कडून स्वतंत्रपणे ५०० किलोवॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येतील. या प्रकल्पास ४७२.१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६ मेगावॉट क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. यासाठी ५१८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत पाच हजार मेगावॉट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात करार झाले. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, ‘महावितरण’चे अध्यक्ष लोकेश चंद्रा, ‘महापारेषण’चे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार, ‘महाजेनको’चे अध्यक्ष पी. अन्बलगन, सतलज जलविद्युत निगमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, ‘मेडा’च्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, या प्रकल्पांमधून ६,७६० रोजगारांची निर्मिती होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३०पर्यंत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता ही नवीकरणीय ऊर्जेद्वारे करायची आहे. ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती देण्याच्या सूचना फडणवीस यांनी संबंधित प्रशासनास केल्या आहेत.